पवारांविरोधात लढणार नाही, दुसरा मतदारसंघ शोधेन, मला देशाची सेवा करायचीय : सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केलं. विधानपरिषदेच्या निमित्तानं महाविकास आघाडीत झालेल्या घडामोडी आणि त्यासंदर्भात झालेलं राजकारण बोलताना सुप्रिया सुळे यांनी मविआ संविधान वाचवण्यासाठी एकत्रित आल्याचं म्हटलं. याशिवाय बारामतीत गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवार यांची पवार आडनावाची नातवंडं आहेत त्यांच्या विरोधात निवडणूक लढणार नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.
सुप्रिया सुळे विधानपरिषद निवडणुकीबाबत काय म्हणाल्या?
सुप्रिया सुळे म्हणाल्या की माझं काल रात्रीच उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं होतं, उद्धव ठाकरे यांचा काल शरद पवार यांना फोन आला होता. जयंत पाटील यांच्याशी देखील बोलणं झालं होतं आणि कालच आम्हाला हे कळलं होतं. मीही काल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलले होते. आता एका मताने महाविकास आघाडीच्या वतीने अंबादास दानवे विधान परिषदेवर जात आहेत.
खरंतर शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांची चर्चा चालली होती .हर्षवर्धन सपकाळ मगाशीच सविस्तर बोलले आहेत. आता वेगळं काय बोलायची गरज वाटत नाही. मी असं काही बघत नाही, पवार साहेबांची देखील बिनविरोध निवडणूक झाली. भारतीय जनता पक्षाने बिनविरोध का दिला? शिंदेंच्या शिवसेनेने बिनविरोध का दिला? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.
महाविकास आघाडी एका विश्वासाच्या प्रेमाच्या नात्यानं संविधान वाचवण्यासाठी एकत्रित आलेली आहे. समंजस पद्धतीने तिन्ही पक्ष महाराष्ट्राच्या हितासाठी आणि देशाच्या हितासाठी काम करत आहेत, त्यामुळे ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात त्यापेक्षा जास्त काही नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
पवारांविरोधात लढणार नाही, दुसरा मतदारसंघ शोधेन
मी विधान केलं की सुप्रिया सुळे ही गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवार यांची जी नातवंड आहेत पवार आडनावाची आहेत यांच्या विरोधात कधीही इलेक्शन लढणार नाही. हेही इलेक्शन मी लढले नव्हते, याही इलेक्शनचा खूपसा इतिहास आहे. जो आज सांगणं गरजेचं वाटत नाही. मागच्या वेळेस देखील तयारी आणि इच्छा बिलकुल नव्हती इथून पुढेही नसणार आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
पवारांच्या कुटुंबातल्या बाई आबांच्या कुठल्याही घरातल्या व्यक्तीच्या विरोधात सुप्रिया सुळे इलेक्शन लढणार नाही. दुसरा मतदार संघ बघेन, मला देशाची सेवा करायची आहे, जर दुसऱ्या कोणाची इच्छा असेल तर मी दुसऱ्या मतदारसंघात काम करेन अडचण काय असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.
जी लढाई टीव्ही वरती चालते ते कुठल्याही सुसंस्कृत घरात होऊ नये अशी माझी प्रांजळ इच्छा आहे. फार कष्टाने पवार कुटुंबावर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या लोकांनी जो विश्वास दाखवला आहे. संघटनेमध्ये अनेक कार्यकर्ते असतात जे आपल्या नेत्यावर विश्वास ठेवून काम करत असतात. त्यामुळे कोणाचंही नुकसान होऊ नये यासाठी मी हे पाऊल टाकलेलं आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
सुप्रिया सुळे यांना बच्चू कडूंसदर्भात विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी ही लोकशाही आहे प्रत्येकाच्या पक्षांमध्ये त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. कोणी कोणाला तिकीट द्यायचा हा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. मी जास्त विचार करत नाही मी आजचा दिवस जगत आहे, उद्याचा दिवस कोणी पाहिला आहे.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी मुख्यमंत्री होतील असा विश्वास असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. आताच मतदान झालं आहे, 4 तारखेला सगळं स्पष्ट होईल, असं त्या म्हणाल्या.
अजित पवारांच्या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला आहे. ते स्वतः जातीने लक्ष घालून चौकशी पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करतील, आपण त्यांच्यावर थोडा विश्वास ठेवूया असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
आणखी वाचा
Comments are closed.